कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष अंमलबजावणी मोहीम

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष अंमलबजावणी मोहीम
पात्र शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव- भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund – AIF) योजनेअंतर्गत देशात विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.
ही योजना ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, पिक काढणीनंतरच्या (Post-Harvest) कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या रु. २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गेॅरेंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे (Cold Storage), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.
या योजनेसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट (SHGs) तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्था लाभासाठी पात्र आहेत.
या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यात व्यापक जनजागृती, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बैंक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र शेतकरी व संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयीकृत/अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.






