Special

विशेष संपादकीय : पाळधी दंगलीची भूमी का होतेय्‌?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राष्ट्रीय महामार्ग, गिरणा नदी आणि छोटे-छोटे उद्योग धंदे अशी पाळधीची ओळख असून सध्या पाळधीला कुणाची तरी दृष्टी लागल्याचे दिसून येते. गेल्या दोन वर्षात येथे क्षुल्लक कारणावरून दंगल होण्याचे प्रकार फोफावत असून त्याला प्रतिबंध घालण्यास अपयश येत असल्याचे कालच्या घटनेवरुन सिद्ध झाले आहे. सन २०२२ च्या मार्च महिन्यात देखील येथे दंगल उसळली होती. दि.३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री जो प्रकार घडला त्याला राजकीय किनार असल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा तालुक्यातील अडावद व बिडगाव हे अतिसंवेदनशील गावे असून येथे गतकाळात दंगलींचा इतिहास आहे. आज तोच इतिहास पाळधी आपल्या शिरावर घेत आहे. पाळधीची वाटचाल ‘दंगलीची भूमी’ अशी होत असतांना त्याला पायबंद घालणे काळाची गरज आहे.

दंगली का होतात? दंगली कोण करते? दंगलीमध्ये कोणाचा जीव जातो? दंगलीमध्ये कोणाचे नुकसान होते? दंगलीची झळ नेमकी कोणाला बसली? कोणा कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले? दंगलीची नेमकी कारणे काय? झालेल्या दंगलींना जातीय दंगलीचे स्वरूप कोण देतो? जातीय दंगली कोण करायला लावते? निवडणुका जवळ आल्या वा संपल्यानंतर जातीय दंगली अधिक का होतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही अणुत्तरीत आहेत.

धरणगाव तालुक्यातील पाळधी हे गाव राजकीय क्षितीजावर देखील बऱ्या पैकी ओळखले जाते. येथील गुलाबराव पाटील हे आक्रमक शिवसैनिक असून ते आज मंत्रिमंडळात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. हिंदू-मुस्लिम अशी संमिश्र वस्ती येथे आहे. आजपर्यंत दोघे समाज गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून येथे क्षुल्लक कारणावरुन दंगल भडकण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. जिल्ह्यातील रावेर, अडावद, बिडगाव येथेही असले प्रकार नित्याचे झाले होते. जातिय दंगलींमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे कळत असतांनाही त्याला ‘खतपाणी’ मात्र कोण घालतो हे समोर येणे महत्त्वाचे आहे.

पाळधीत काल झालेला प्रकार प्रशासनासह लोकप्रतिनिधींना देखील आत्मचिंतन करण्यास भाग पाडत आहे. नववर्षाच्या पूर्वसंधेला एका क्षुल्लक कारणामुळे गालबोट लागत असेल तर गोपनीय शाखेवर देखील प्र्रश्नचिन्ह निर्माण होते. पाळधीत बाहेर गावातून पोटा-पाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. हे लोक तेथेच आपले वस्तान बसवतात अन्‌ लहान-लहान गोष्टींचे भांडवल करुन जातिय द्वेष देखील पसरविण्यात पुढे राहतात.

पूर्वीचा पाळधीमधील जातीय सलोखा आणि आजचा सलोखा यांचे मोजमाप केले तर सलोख्याला ‘जातीय रंग’ वाढीस लागल्याचे स्पष्ट होते. छोट्या-छोट्या प्रकरणांमधील वाढलेला राजकीय हस्तक्षेप आणि त्यातून उफाळून येत असलेला जनप्रक्षोभ अशा जातीय दंगलींसाठी कारणीभूत ठरत आहे. पोलीस प्रशासनावर नाहक दडपण टाकून आपला उल्लू साध्य केला जात असल्याने दुसरा गट नाराज होतो अन्‌ त्यातून माथी भडकतात अन्‌ दंगलीचे लोण पसरते हे न कळण्याइतपत पाळधीकर खुळे नाहीत!

जिल्ह्यातील जातीय सलोखा बऱ्यापैकी टिकून असतांना पाळधीची वाटचाल मात्र ‘दंगलीची भूमी’ होणे धोक्याचे आहे. दंगलीत कुणीही साखर वाटत नाही मात्र त्यावर सलोख्याने मार्ग काढणे आणि एकात्मता टिकवून ठेवणे हेच हिताचे आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button