डायल ११२ मध्ये जळगाव पोलिसांची बाजी; नाशिक परिक्षेत्रात जूनमध्ये प्रथम क्रमांक
अवघ्या ७ मिनिटांच्या अंतिम प्रतिसाद वेळेसह जळगाव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; जून महिन्यात २८४८ आपत्कालीन कॉल्सना तत्पर प्रतिसाद

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । डायल ११२ आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने जळगाव पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक परिक्षेत्रात जून २०२६ महिन्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या ७ मिनिटांच्या Final Response Timing सह जळगाव पोलिसांनी सर्व जिल्ह्यांना मागे टाकत आपत्कालीन सेवेमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
जून २०१६ मध्ये जळगाव जिल्ह्यातून २८४८ आपत्कालीन कॉल्स डायल ११२ वर प्राप्त झाले. प्रत्येक घटनेवर तातडीने प्रतिसाद देत पोलीस यंत्रणेने नागरिकांना शक्य तितक्या कमी वेळेत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्याने नाशिक परिक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
नाशिक परिक्षेत्रातील जिल्हानिहाय Final Response Timing
- जळगाव : 7 मिनिटे
- नंदुरबार : 8 मिनिटे 33 सेकंद
- धुळे : 8 मिनिटे 39 सेकंद
- नाशिक ग्रामीण : 10 मिनिटे 09 सेकंद
- अहिल्यानगर : 14 मिनिटे 19 सेकंद
या आकडेवारीवरून जळगाव पोलिसांचा प्रतिसाद सर्वाधिक वेगवान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यशामागे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डायल ११२ व्यवस्थेचा घेतलेला सखोल आढावा आणि दिलेल्या प्रभावी सूचनांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. त्यांनी नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे आणि प्रतिसाद पथकांमध्ये अधिक समन्वय ठेवण्यावर भर दिला. प्रत्येक कॉलला प्राधान्याने प्रतिसाद देण्याचे तसेच घटनास्थळी शक्य तितक्या कमी वेळेत पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करत प्रत्येक आपत्कालीन कॉलवर तात्काळ प्रतिसाद दिला. परिणामी अनेक नागरिकांना वेळेत मदत मिळाली आणि पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.
डायल 112 ही सेवा अपघात, गुन्हे, महिला सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी, सार्वजनिक सुव्यवस्था तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळवून देणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. या सेवेमध्ये जळगाव पोलिसांनी मिळवलेले हे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून नागरिकांप्रती असलेली तत्परता, शिस्तबद्ध नियोजन आणि कार्यक्षम पोलीस यंत्रणेचे प्रतीक मानले जात आहे.
जून २०२६ मधील ही उल्लेखनीय कामगिरी जळगाव पोलीस दलाच्या प्रतिमेत आणखी भर घालणारी ठरली असून, भविष्यातही नागरिकांना अधिक जलद, प्रभावी आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची ही प्रचिती असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





