जनगणना-२०२७ पूर्वचाचणी १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार

जनगणना-२०२७ पूर्वचाचणी १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
जळगाव, प्रतिनिधी: भारत सरकारने जनगणना-२०२७ साली घेण्याचा निर्णय आधीच अधिसूचित केला गेलेला आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना (टप्पा-१) हा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत एका महिन्याच्या अवधीत पार पडेल, तर लोकसंख्या गणना (टप्पा-२) फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित केली जाईल. जनगणना ही जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार केली जाणार आहे.
जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. या अंतर्गत जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची (घरयादी व घरगणना) पूर्वचाचणी ही १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देशभरात पार पडणार आहे. तसेच स्व-गणना (Self Enumeration) करण्याचा पर्यायही १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांसाठी उपलब्ध राहील.
महाराष्ट्र राज्यात या पूर्वचाचणीसाठी निवडक तीन नमुना क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-वेस्ट प्रभागातील नमुना क्षेत्र यांचा समावेश आहे.
पूर्वचाचणीदरम्यान जनगणना अधिनियम, १९४८ च्या सर्व तरतुदी लागू राहतील. जनगणनेकरिता नियुक्त प्रगणक आणि पर्यवेक्षक जे माहिती संकलनासाठी संबंधित क्षेत्रांतील घरे व कुटुंबांना भेट देतील, त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन निवडलेल्या नमुना क्षेत्रातील सर्व नागरिकांना करण्यात येत असल्याचे जनगणना संचालनालय, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कले आहे.






