जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चार तास घेराव

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चार तास घेराव
डिझेलटंचाईमुळे शेतकरी हवालदिल; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी तसेच ट्रॅक्टर, मळणी यंत्रे व अन्य कृषी वाहनांसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी चार वाजेपासून ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही शासकीय वाहन बाहेर जाऊ दिले नाही.
शेतकऱ्यांना वेळेत डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी हंगामातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांना प्रशासनाकडून उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तहसील कार्यालये व इतर शासकीय कार्यालयांबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच कोणतेही शासकीय अधिकारी, आमदार किंवा खासदार यांची वाहने जिल्ह्यात फिरू दिली जाणार नाहीत, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, वाय. एस. महाजन, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, रमेश पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, रिकू चौधरी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, मजर पठाण, गौरव वाणी, संजय पाटील, आकाश हिवाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





