डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचा राज्यस्तरीय सन्मान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचा राज्यस्तरीय सन्मान
जळगाव,: समाजकल्याण विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी जळगाव जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव यांना राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला असून, त्यांना प्रथम क्रमांक व ₹५ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
हा गौरव समारंभ १० जून २०२५ रोजी मुंबई येथे पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाळेच्या वतीने सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) श्री. योगेश पाटील व मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
गुणवत्तापूर्ण कार्याची दखल
शाळेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या शिक्षणात गुणवत्ता, निवासी सुविधा, नियमित आरोग्य तपासणी, पोषण आहार, अभ्यासिका, कौशल्यविकास प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण तसेच पालक-शिक्षक संवाद यासारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला. शाळा व्यवस्थापन समितीची कार्यक्षम भूमिका, शिक्षक व कर्मचाऱ्यांची समर्पित सेवा, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न या पुरस्कारासाठी कारणीभूत ठरले.
विभागीय सन्मानाचेही यश
याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ, मुलींचे वसतिगृह, भुसावळ तसेच हरिजन सेवक संघ संचालित हरिजन कन्या छात्रालय, जळगाव या संस्थांनाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
सहकार्य आणि समन्वयातून घडलेले यश
या यशामध्ये जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग, शिक्षकवृंद आणि स्थानिक यंत्रणांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. “हा पुरस्कार संपूर्ण जिल्ह्याच्या एकत्रित प्रयत्नांची पावती आहे. भविष्यातही ही गुणवत्ता टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत सहाय्यक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्ह्याचा राज्यपातळीवर गौरव
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याची सामाजिक न्याय क्षेत्रातील कामगिरी राज्यस्तरावर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या शिक्षण व कल्याण व्यवस्थेला प्रेरणादायी दिशा मिळाली असून, इतर संस्थांसाठीही एक आदर्श निर्माण झाला आहे.