गिरणा धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन; नदीपात्रात जाणे टाळा
चाळीसगाव | प्रतिनिधी : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही क्षणी अतिरिक्त पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत गिरणा धरणात २०,४४३ दलघफूट (९४.२९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, मुंबई वेधशाळेने ३० व ३१ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
यामुळे गिरणा नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित सर्व शासकीय विभागांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना पूर्वसूचना देऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. नदीपात्रात प्रवेश करणे, पाण्याजवळ जाणे किंवा पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
“धरणाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकतेनुसार कोणत्याही क्षणी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. त्यामुळे गिरणा नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”
— विजय प्र. जाधव, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव






