सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू

सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू
जळगाव I प्रतिनिधी जळगाव येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया ३० जून २०२६ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
जळगाव शहर तसेच जिल्ह्यातील जवळील तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व युद्ध विधवांच्या मुलांना, माजी सैनिक विधवांच्या मुलांना तसेच सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहात निःशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार असून अतिरिक्त जागा उपलब्ध असल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांनाही प्रवेश दिला जाईल.
वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, शारीरिक प्रशिक्षण, सोलर प्रणालीद्वारे गरम पाण्याची सुविधा, उत्कृष्ट खेळाचे मैदान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सणांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय विद्यार्थ्यांना वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनही केले जाते.
वसतिगृहाचे शुल्क अधिकारी व ऑनररी रँकसाठी प्रतिमहा ३,००० रुपये, जेसीओंसाठी २,८०० रुपये आणि शिपाई/एनसीओंसाठी २,५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा आणि माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना प्रवेश पूर्णतः मोफत राहणार आहे. इतर नागरी पाल्यांसाठी भोजन, निवास व सेवा करासह प्रतिमहा ३,५०० रुपये शुल्क आकारण्यात येईल.
प्रवेश अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित सैनिकी वसतिगृहात अर्ज सादर करावेत. प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या सुविधेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (प्रभारी) संजय रामराव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव (दूरध्वनी : ०२५७-२२४१४१४) किंवा वसतिगृह अधीक्षक श्री. समाधान धनगर (मो. ७३७८९४२३२७, दूरध्वनी : ०२५७-२२३३०८८) यांच्याशी संपर्क साधावा.






