जळगाव मनपाला नवे नेतृत्व; आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली, आदित्य जिवने यांची नियुक्ती

जळगाव मनपाला नवे नेतृत्व; आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली, आदित्य जिवने यांची नियुक्ती
राज्य शासनाच्या प्रशासकीय फेरबदलात महत्त्वाचा निर्णय; जळगावच्या विकासकामांना मिळणार नवी गती?
जळगाव, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या आयुक्त बदलीच्या चर्चांवर अखेर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०२१ बॅचचे तरुण आयएएस अधिकारी आदित्य जिवने यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी केल्याने जळगाव महापालिकेच्या कारभारात नव्या पर्वाची सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
संभाजीनगरहून जळगावकडे नियुक्ती
नवनियुक्त आयुक्त आदित्य जिवने हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. महावितरणमधील त्यांच्या प्रभावी कामकाजाची दखल घेत राज्य शासनाने त्यांच्यावर जळगावसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहराची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ढेरे यांच्या पुढील नियुक्तीबाबत अद्याप उत्सुकता
मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली निश्चित झाली असली तरी त्यांची पुढील नियुक्ती नेमकी कुठे होणार याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बदलीचे आदेश प्राप्त झाले असले तरी नव्या पदस्थापनेचे पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील जबाबदारीबाबत प्रशासनात उत्सुकता कायम आहे.
राज्यातील आणखी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य शासनाने याच आदेशात इतर काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याही जाहीर केल्या आहेत. डॉ. माधवी खोडे-चवरे यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुनील महिंद्रकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अनिता मेश्राम यांची मनरेगा आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
विकासकामांकडे लागले जळगावकरांचे लक्ष
तरुण व ऊर्जावान प्रशासकीय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आदित्य जिवने यांच्या नियुक्तीमुळे जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शहरातील रस्ते, अमृत पाणीपुरवठा योजना, स्वच्छता व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि विविध पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीला नव्या वेगाने चालना मिळेल का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. जळगाव महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीत अधिक गतिमानता येऊन रखडलेल्या योजनांना चालना मिळेल, असा विश्वास प्रशासन आणि नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.





