राज्यातील सुधारणा कार्यक्रमात तिसऱ्या क्रमांकाने भरारी; जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पार पडलेल्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करत जळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा मुंबईत विशेष गौरव करण्यात आला.
राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या सुधारणा उपक्रमात पोलिसांची कार्यक्षमता, जनतेशी संवाद, गुन्हेगारीवर नियंत्रण, तांत्रिक साधनांचा वापर आणि पारदर्शक प्रशासन या निकषांवर जिल्ह्यांचे मूल्यमापन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्याने या सर्व निकषांवर उल्लेखनीय प्रगती करत राज्यात तिसरे स्थान मिळवले.
गौरव सोहळ्याप्रसंगी जळगावचे पालक सचिव व महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस महासंचालक यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दलाने दाखवलेल्या कार्यक्षमतेचे कौतुक करत, हे मॉडेल राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही पोलिसांनी जनतेशी निर्माण केलेला विश्वास आणि कायदा-सुव्यवस्थेवरचे नियंत्रण या गोष्टींची प्रशंसा केली.
जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच नागरिकाभिमुख पोलीस यंत्रणा उभारण्यावर डॉ. रेड्डी यांनी विशेष भर दिला होता. त्यांच्या पुढाकाराने अनेक नवकल्पनांची अंमलबजावणी झाली असून, या यशामध्ये संपूर्ण जळगाव पोलीस दलाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.