विशेष आषाढी रेल्वेने वारकरी पंढरपूरकडे रवाना

विशेष आषाढी रेल्वेने वारकरी पंढरपूरकडे रवाना
भुसावळ स्थानकावर हिरवा झेंडा; जळगाव-बुलडाणा परिसरातील वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव, बुलडाणा व परिसरातील वारकरी मोठ्या उत्साहात विशेष आषाढी रेल्वे गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात विशेष आषाढी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार भुसावळ येथून २४ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता विशेष अनारक्षित रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली. ही गाडी २५ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार असून, त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघून २६ जुलै रोजी भुसावळ येथे दाखल होणार आहे.
मोफत प्रवासाची व्यवस्था
वारकऱ्यांना कोणताही आर्थिक भार पडू नये यासाठी या विशेष गाडीच्या जनरल तिकिटांची व्यवस्था स्वखर्चाने करण्यात आली. त्यामुळे वारकऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली. गाडी रवाना होण्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठुरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात विशेष आषाढी रेल्वेला निरोप देण्यात आला.






