भुसावळ येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात

भुसावळ येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात
भुसावळ : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे शाळेच्या माजी विद्यार्थिनी सुरेखा भंगाळे (विवाहानंतर स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन २०१२ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येते. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र आवटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील सुधाकर नारखेडे, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने, सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. यावेळी सुधाकर नारखेडे यांनी मागील १४ वर्षांपासून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यामागील उद्देश व प्रेरणा स्पष्ट केली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. रोशनी विशाल परदेशी हिला १,५०१ रुपयांचा धनादेश प्रमुख अतिथी सुधाकर नारखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या आशिष विजय जाधव याला १,१०० रुपयांचा धनादेश शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र आवटे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुधाकर नारखेडे यांना पत्नीच्या आठवणीने भावुक होऊन अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक मनोगताने उपस्थितांचे वातावरण भारावून गेले.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र आवटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या यशामागे असलेली मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. यश एका दिवसात मिळत नाही; त्यासाठी सातत्य, शिस्त, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रथम क्रमांक मिळविता न आलेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता गुणवंत विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अधिक जोमाने प्रयत्न करावेत, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. शिक्षकांच्या समर्पणाचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक करताना म्युनिसिपल हायस्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले कुटुंब असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी मनोगत व्यक्त करून सुधाकर नारखेडे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले.“परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






