पेरणीपूर्वी डिझेल टंचाई, ही परिस्थिती आपत्ती म्हणून जाहीर करा : अँड.रोहिणी खडसे

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पावसाळा तोंडावर असताना आणि शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवत त्यांनी ही परिस्थिती “आपत्ती” म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागत, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पंप सुरू करणे आणि इतर शेती अवजारांच्या तयारीत व्यस्त आहेत. अशा वेळी डिझेलची वाढती दरवाढ, साठ्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि अनेक ठिकाणी उपलब्धतेचा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात विविध उपाययोजना सुचवत प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांनी, ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावी, प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयांतर्गत “शेतकरी डिझेल मदत कक्ष” तातडीने सुरू करण्यात यावा, डिझेल टंचाई पूर्णपणे दूर होईपर्यंत हा मदत कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात यावा, तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील डिझेल साठ्याची माहिती दर तासाला सोशल मीडियाद्वारे आणि मदत कक्षामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक पेट्रोल पंपावरील किमान ३० टक्के डिझेल साठा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावा, ट्रॅक्टर किंवा वाहन प्रत्यक्ष पंपावर आणण्याची सक्ती करू नये. शेतकऱ्यांनी आणलेल्या सुरक्षित कॅन, ड्रम किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पेरणी प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशाराही दिला आहे.






