मुसळधार पावसाने अमळनेर शहर जलमय
सखल भागात गुडघाभर पाणी; जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना

मुसळधार पावसाने अमळनेर शहर जलमय
सखल भागात गुडघाभर पाणी; जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरात गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.

सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून मदतकार्य सुरू केले असून आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी मयुर भंगाळे, तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज शेटे यांनीही पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
प्रशासनाकडून पाणी साचलेल्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन सतर्क
महसूल, पोलीस व स्थानिक प्रशासनाची यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






